D. B. Dhamanaskar : ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर काळाच्या पडद्याआड; मराठी साहित्यविश्वावर शोककळा
D. B. Dhamanaskar : ज्येष्ठ मराठी कवी दत्तात्रेय भास्कर धामणस्कर यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या साहित्यिक प्रवासाची आणि योगदानाची माहिती जाणून घ्या.

D. B. Dhamanaskar : मराठी काव्यविश्वात संवेदनशील, सुसंस्कृत आणि विचारशील लेखणीने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रेय भास्कर (द. भा.) धामणस्कर यांचे आज निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने शब्दांचे मर्म जाणणारा ऋजू आणि विचारवंत कवी गमावला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते डोंबिवलीत वास्तव्यास होते.
अहमदाबाद ते डोंबिवली असा जीवनप्रवास
द. भा. धामणस्कर यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1930 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत एम.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेत दीर्घकाळ सेवा बजावली. 1988 मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. सप्टेंबर 1960 पासून ते डोंबिवलीचे रहिवासी होते. डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. येथील ‘काव्यरसिक मंडळा’च्या सुरुवातीपासूनच्या सक्रिय सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
वयाच्या 17व्या वर्षी लिहिली पहिली कविता
धामणस्कर यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली. पुढे ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘कविता-रती’, ‘दीपावली’, ‘हंस’ आणि ‘मराठवाडा’ यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. ग्रंथालीच्या ‘दशकाची कविता’ या महत्त्वाच्या संकलनातील दहा निवडक कवींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.
साहित्य अकादमीच्या साठोत्तरी मराठी कवितेच्या संकलनात तसेच ज्ञानपीठाच्या ‘भारतीय कवितायें 1983’ या ग्रंथात त्यांच्या पाच कवितांचा समावेश झाला. त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले.
पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांवरही संस्कार
धामणस्कर यांच्या कवितांनी प्रगल्भ वाचकांसोबतच विद्यार्थी वर्गावरही प्रभाव टाकला. महाराष्ट्र सरकारच्या इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची मानवी मूल्यांची जपणूक करणारी ‘वस्तू’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘कंदील विकणारी मुले’ या त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील त्यांचे कवितावाचनही लोकप्रिय झाले. ‘दिवे असावे’, ‘वस्तू’, ‘हस्तांतर’ यांसह त्यांच्या विविध कवितांमधून मानवी नाती, संवेदना, परंपरा, निसर्ग आणि जीवनमूल्यांचे दर्शन घडते.
द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने मराठी काव्यक्षेत्रातील एक समृद्ध पर्व संपले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्य वर्तुळातून शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
द. भा. धामणस्कर यांना मिळालेले पुरस्कार –
– ‘प्राक्तनाचे संदर्भ’ (1982) : या पहिल्याच संग्रहाला राज्य सरकारचा मानाचा केशवसुत पुरस्कार’ मिळाला
– ‘बरेच काही उगवून आलेले’ (2001) : या संग्रहाला प्रतिष्ठित ‘कवी कुसुमाग्रज पारितोषिक’ लाभले.
– ‘भरून आलेले आकाश’ (2016): हा त्यांचा तिसरा लोकप्रिय कवितासंग्रह होता.
द. भा. धामणस्कर यांच्या काही कविता…
१
रात्रभर,
सगळेच तारे माझेच असल्यासारखा
मी त्यांच्याकडे पाहत राहिलोय;
उजाडताना, मी ही आकाशासारखा पुन्हा
कफल्लक होणार आहे
२
माझ्या आतही
गडावरच्या निर्मळ वाऱ्यावर
सूर्य उगवायच्या आधीच
कड्याखालचा पांढरा चाफा
सर्वांगांनी फुललेला पाहतो,
तेव्हा वाटते :
अशा वेळी माझ्या आतही
असेच शुभ्र काही फुलावे
जन्मापासून माझ्या आतच
ठाण मांडून बसलेल्या तुझ्यासाठी
तू निर्मिलेल्या सृष्टीचे मलाही
उदंड कौतुक आहे हे
तुला कळलेय् याचा
कौल मागण्यासाठीही
३
कवितेची वही गच्च भरून गेलीय :
आता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत ..
काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावीत
ज्यांची दूर विजनात गाणी होतील,
काही नदीत सोडावीत
म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील,
काही पाखरांना द्यावीत
त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल
त्यांनाच परत केल्यासारखी,
काही ढगांवर डकवावीत
जी देशाच्या सीमा ओलांडताना
आपोआपच रूपांतरित होतील…
नंतर
ज्यांची दूर विजनात गाणी होणार नाहीत,
जी नाकारतील वाहणे नव्याने,
ज्यांचा कुठल्याच कोलाहलाशी संबंध नाही,
ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायच्या नाहीत
अशी काही पाने उरतीलच; ती सर्व
कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावीत :
तुम्हीच झाडांचे बहर आहात असे
मीच त्यांना कैकदा सांगितलेले आहे.
४
दिवे असावे कोमल हळवे
अंधाराहून उजळ जरासे ।
दिवेलागणी झाल्यावरती
अंतर्यामी खिन्न, कसेसे ।।
दिवे असावे आत्मज्ञानी
त्यांना मुळी न गर्व असावा ।
अंधाराची सत्ता नव्हती
इतुका त्यांनी प्रकाश द्यावा ।।
दिवे असावे जगन्मित्रसे
कुणाशीच त्या वैर नसावे ।
तिमिराशीही जमेल तेव्हा
हितगुज त्यांनी रोज करावे ॥
दिवे असावे रसिकही केव्हा
ताऱ्यांचे नभ त्यांचे व्हावे,
चांदण्यात कधी न कळत त्यांनी
हळूच चांदणे होवून जावे…
५
वस्तूंना जीव नसेलही कदाचित,
पण नसल्यासारखे वागवू नये त्यांना
वस्तूंना मनही नसेल कदाचित,
पण ते असल्यासारखे वागलो
तर वस्तू प्रचंड सुखावतात
वस्तू निखालस सेवक असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या
वस्तूंनाही असते आवड
स्वच्छ राहण्याची
हे हातांना लक्षात
ठेवायला सांगा
वस्तूंना जपावे,
लाडावूनही ठेवावे
यापुढे जावून
त्याच जिवंत ठेवणार आहेत
आपला स्नेह नंतरच्या काळातही
आयुष्य संपले की वस्तूंनाही
आजवरच्या हक्काच्या घरात
राहू देत नाहीत,
तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा
त्यांचा हक्क शाबूत ठेवावा
६
विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली,
तेव्हा उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला:
द्या इकडे.
मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून,
तर मी एका दैवी आनंदात
अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या..
मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला…
७
पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्याइतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील
कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणाऱ्या झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा….
तिने फ़क्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर….
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.
त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट….
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात,
तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस…





