Vithabai Narayangaonkar : दगडाने नाळ ठेचली, तंबूत दिला लेकीला जन्म आणि…; अंगावर शहारे आणणार आहे प्रसंग, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
Vithabai Narayangaonkar : ईठा या चित्रपटातून विठाबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा जीवनपट उलघडला जाणार आहे.

Vithabai Narayangaonkar : हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक्सचा ट्रेंड सध्या जोरात असून आता आणखी एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची कथा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या प्रमुख भूमिकेतील ‘ईठा’ हा चित्रपट अंतिम टप्प्यात असून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासाची देशभर चर्चा सुरू झाली आहे. ईठा या चित्रपटातून विठाबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा जीवनपट उलघडला जाणार आहे.
कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
महाराष्ट्राच्या लोककलेचा झेंडा देशभर फडकवणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म जुलै 1935 मध्ये पंढरपूर येथे झाला. तमाशा आणि लोककलेची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या विठाबाईंना बालपणापासूनच लावणी, गवळण आणि वगनाट्याचे संस्कार लाभले. अवघ्या 12 व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले आणि आपल्या नैसर्गिक कलागुणांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
मात्र त्यांचा हा जीवनप्रवास संघर्षांनी भरलेला होता. अनेक अडचणी आणि संकटांवर मात करत त्यांनी लावणीला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आजही अंगावर शहारे आणणारा मानला जातो आणि ‘ईठा’च्या टीझरमध्येही तोच प्रसंग प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. ज्यामुळे अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाहीत.
हेही वाचा : Aditya thackeray : “उद्धव साहेबांचं मन मोठं…”; ओमराजे निंबाळकरांना आदित्य ठाकरेंची भावनिक साद
नेमका काय आहे प्रसंग?
नऊ महिन्यांच्या गरोदर असताना विठाबाई ‘रक्तात न्हाली कुऱ्हाड’ हे वगनाट्य सादर करत होत्या. प्रयोग सुरू असतानाच त्यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या. मात्र त्यांनी कार्यक्रम अर्धवट सोडला नाही. वेदना असह्य झाल्यानंतर त्या तंबूत गेल्या आणि तिथेच त्यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे, त्यांनी बाळाची नाळ स्वतः दगडाने तोडून काही मिनिटांतच कपडे बदलत त्या पुन्हा रंगमंचावर परतल्या आणि नृत्य सादर करू लागल्या. हा प्रसंग अत्यंत भावनिक आणि अंगावर काटा आणणार आहे. त्यांनी ज्या बाळाला जन्म दिला त्या म्हणजे प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी मंगलाताई बनसोडे.
विठाबाईचं योगदान मोठं
विठाबाई यांचं लावणीतील योगदान अतुनीय आहे. देशभक्तीची भावना जपणाऱ्या विठाबाईंनी 1962 च्या भारत-चीन युद्धावेळीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्या आपल्या कलापथकासह थेट नेफा सीमेवर पोहोचल्या आणि कठीण परिस्थितीत जवानांसाठी तमाशाचे प्रयोग सादर केले. त्यांच्या अद्वितीय कलेचा गौरव राष्ट्रीय स्तरावरही झाला. 1957 आणि 1990 मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मात्र आयुष्यभर लोककलेची सेवा करूनही त्यांच्या उत्तरार्धात गरिबी आणि हालअपेष्टांना सामोरे जावे लागले.
विठाबाईंच्या व्यक्तिरेखेत श्रद्धा कपूर
विठाबाईंच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केला. लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. ‘ईठा’ या चित्रपटाच्या माध्यमातून विठाबाईंचा संघर्ष, जिद्द आणि लोककलेसाठीचे समर्पण नव्या पिढीसमोर येणार आहे. त्यांची व्यक्तीरेखा प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारत आहे. हा चित्रपट अॅागस्ट महिन्यात प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Omraje Nimbalkar : ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांनी घेतली ओमराजेंची भेट; मध्यरात्री पुण्यात नेमकं काय घडलं?






