कल्याण – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला नाही. तर कॉंग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, असा दावा रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेल्या आरोपावर रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कल्याण येथे आयोजित एक कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे.
आठवले म्हणाले, शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कॉंग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गीते यांचा आरोप चूकीचा आहे. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजप, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचे शिवशक्ती-भिमशक्ती स्वप्न साकार केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या आरोप प्रत्यारोगाचे राजकारण सुरू आहे. मात्र, उलट सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सजंय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत. खासदार, प्रवक्ते आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी असे चूकीचे आरोप करून वेळ घालवू नये, असा सल्ला आठवले यांनी राऊत यांना दिला आहे.