काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून फडणवीसांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, – “देवेंद्र फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस”

नागपूर – एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे शिल्लक नाही. शिंदे आणि अजितदादांची उपयुक्तता आता संपल्यात जमा आहे, असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तर मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्रिपद अन् मंत्रिपदावर काम करणारे अनेक जण आहेत. त्यात काही नवीन नाही. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलेच होते असेही त्यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या आशीर्वादानेच त्यांना सत्तेत राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाही. ते विरोधही करू शकणार नाहीत. सत्ता नाही दिली तरी गपचुप बसण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही, असा टोला त्यांनी शिंदे आणि अजितदादांना लगावला. सोबतच फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे, असे म्हणत त्यांचे तोंडभरून कौतुकही त्यांनी केले.
विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, अनेकवेळा आम्ही विदर्भाच्या प्रश्नावेळी आमदार असताना सुद्धा लॉबीमध्ये बसून कोणत्या प्रश्नाला आपण पुढे नेले पाहिजे देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करायचो. आजही विदर्भाच्या प्रश्नासाठी न्याय मागायचा असेल तर आम्ही झुकते माप दिलेले आहे. सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरही विदर्भाच्या प्रश्नाला घेऊन चर्चा होताना गंभीर फडणवीसांना पाहिले आहे.
सत्ता ही क्षितिजापलिकडेही विचार करायला लावते –
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता ही क्षितिजापलिकडे विचार करायला लावते. जी क्षितिज नजरेला असते त्याच्या पलिकडेही विचार करणारी सत्ता असते. प्रत्येकजण पुढचे पाऊल गाठण्यासाठी धडपडत असतो. देवेंद्र फडणवीसांचा स्वभावच असा आहे की त्यांना पुढचे पाऊल गाठायचे असते. मित्र म्हणून आम्ही जवळ असू परंतू राजकीय विरोधक म्हणून फार काही आम्ही अपेक्षा ठेवत नाही.





