आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला जनतेची साथ मिळेल, काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा विश्वास

धुळे – राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला जनतेची साथ मिळेल, असा विश्वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत 38, तर विधानसभेच्या निवडणुकीत 180 जागा मिळतील, असेही ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदारांचा मेळावा पार पडला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडले आहे.
थोरात, राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौरा करण्यात व्यस्त आहेत. जेव्हा कुटुंबातील सर्व परिस्थिती चांगली असते तेव्हा देवदर्शनाला जावे, असे म्हटले जाते. परंतु मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौरा करून शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे, असे थोरात यांनी यावेळी सांगितले.
ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली होती. याबाबतही थोरात म्हणाले की, जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले.





