Pune District : बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याच्या आजारांची साथ
Pune District : आळेफाटा येथील कान, नाक व घसातज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या वातावरणात घसादुखीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते.

आळेफाटा : बदलत्या हवामानामुळे हवेत गारवा वाढल्याने आळेफाटाकरांना ताप, सर्दी आणि खोकल्याने हैराण केले आहे. त्यातच घसादुखी, घसा खवखवणे आणि आवाज बसण्याच्या तक्रारीही वाढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. हा त्रास संसर्गजन्य स्वरूपाचा असू शकत असल्याने घसादुखी, घसा बसणे किंवा घशाशी संबंधित अन्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
हवामानात अचानक बदल झाल्यानंतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यंदाही ताप, सर्दी आणि खोकल्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये वाढल्या आहेत. काही नागरिकांना खोकला फारसा जाणवत नसला, तरी घसादुखी, घसा खवखवणे, अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणे अशा तक्रारी जाणवत आहेत. काहींना जेवल्यानंतर खोकल्याची उबळ येऊन उलटी होण्यासारखी भावना होत असल्याचेही दिसून येत आहे.
आळेफाटा येथील कान, नाक व घसातज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या वातावरणात घसादुखीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते. काही नागरिकांना केवळ घसा दुखणे, घशात खवखव होणे किंवा तीव्र वेदना होणे अशी लक्षणे जाणवतात; मात्र खोकला होत नाही. काही वेळा घशाचा भाग लाल होणे किंवा टॉन्सिल्सना सूज येणे यामुळेही घशाचा त्रास होऊ शकतो. घशाशी संबंधित त्रासाची सुरुवात झाल्यानंतर स्वतःहून औषधे घेण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्राथमिक अवस्थेत शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, ताजा व सकस आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे आणि घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी पितात. मात्र थंडीच्या दिवसांत तहान कमी लागल्याने पाणी पिण्याचे प्रमाणही कमी होते. दुसरीकडे तिखट, उष्ण आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. रस्त्यावरील तळलेले व तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळेही आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखीच्या तक्रारी वाढत असताना नागरिकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आहारात ताजे व सकस पदार्थांचा समावेश करावा, दररोज एखादे फळ खावे आणि पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला फिजिशियन डॉ. शिवाजी फड आणि डॉ. प्रदीप यादव यांनी दिला. हवामानातील बदलाच्या काळात लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.





