CJP : मोठी बातमी! ‘या’ मागणांसाठी दिल्ली पुन्हा जाम होणार; सीजेपीचा 5 सप्टेंबरला इंडिया गेटवर भव्य मोर्चा
CJP : कॉकरोच जनता पार्टीने 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली आहे. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत हा मार्च काढला जाणार असून NEET प्रकरणातील मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे.

CJP : जंतर-मंतरवर महिनाभराहून अधिक काळ आंदोलन केल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ने पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने 25 जुलै रोजी तरुणांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर 5 सप्टेंबरला इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे.
सीजेपीचे सहसंयोजक सौरव दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोर्चाचे नेतृत्व NEET परीक्षेशी संबंधित प्रकरणांत जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय तसेच पोलिसांच्या कथित क्रुरतेला बळी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय करणार आहेत. देशभरातील विद्यार्थी, युवा संघटना आणि तरुण नागरिक या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, सरकारने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून तरुणांनी 25 जुलै रोजीचा देशव्यापी विरोध मागे घेतला होता. मात्र, त्यानंतर महिनाभर उलटूनही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. सरकारने केवळ विलंब केला असून सर्वोच्च न्यायालयासमोरही स्पष्ट विश्वास दिलेला नसल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.
ऑनलाइन बैठकीत सरकारच्या भूमिकेवर चर्चा –
सीजेपीने सोमवारी राष्ट्रीय कार्यसमितीची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत केंद्र सरकार तसेच भाजप-एनडीएशासित राज्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आढावा घेण्यात आला. या आश्वासनांच्या आधारेच 25 जुलैचा देशव्यापी आंदोलनाचा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, सरकारच्या हेतूबाबत कार्यसमितीच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली.
‘आमच्या संयमाला कमजोरी समजू नये. सद्भावनेचा गैरफायदा घेता येणार नाही,’ अशी भूमिका पक्षाने मांडली. त्यानंतर 5 सप्टेंबर 2026 रोजी दिल्लीमध्ये शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीजेपीच्या दोन प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित –
NEET पेपर लीकविरोधातील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान सीजेपीने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. यातील शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
मात्र, पेपर लीकमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देणे आणि आंदोलनकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे, या दोन मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. सरकारने या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, असा पक्षाचा आरोप आहे.





