Railway Accident: आम्ही हे किती काळ सहन करणार? ममता बॅनर्जींची केंद्र सरकारवर आगपाखड

कोलकाता – देशात सध्या सुरू असलेल्या रेल्वे अपघातांच्या मालिकांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर चांगलीच आगपाखड केली आणि रेल्वेबाबतच्या केंद्राच्या उदासीनतेचा अंत होणार नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, ममतांनी विचारले आहे की रेल्वे अपघात ही नित्याचीच बाब झाली असून असा काय कारभार असतो काय. जवळपास दर आठवड्याला ही भयानक स्वप्नांची मालिका, रेल्वे रुळांवर होणारे मृत्यू आणि जखमींची ही न संपणारी रांग: आम्ही हे किती काळ सहन करणार? भारत सरकारच्या उदासीनतेचा अंत होणार नाही का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
मुंबई-हावडा मेलचे १८ डबे घसरले –
झारखंडच्या सरायकेला-खरसावन भागात मंगळवारी पहाटे मुंबई-हावडा मेलचे किमान १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागांतर्गत जमशेदपूरपासून ८० किमी अंतरावर बारांबूजवळ पहाटे ३.४५ वाजता हा अपघात झाला.सध्या देशभरात अनेक ठिकाणी वारंवार रेल्वे अपघात घडत असून त्यावरून रेल्वे मंत्रालय टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहे.
एसईआरचे प्रवक्ते ओम प्रकाश चरण यांनी सांगितले की घटनास्थळा जवळच मालगाडीचे आणखी काही डबे रूळावरून घसरले, परंतु हे दोन्ही अपघात एकाच वेळी झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.घसरलेल्या हावडा- मुंबई मेलला २२ डबे होते त्यातील १८ डबे रूळावरून घसरले आहेत. यापैकी १६ प्रवासी डबे, एक पॉवर कार आणि एक पॅन्ट्री कार होती.अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना बाराबांबूमध्ये वैद्यकीय मदत दिली गेली. त्यांना आता चांगल्या उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात येत आहे, असे एसईआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.





