Devendra Fadnavis :‘सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी…’, पहाटेच्या शपथविधीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis : नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक पहाटेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल घडून आलेले पाहायला मिळाले. या शपथविधीची आजही चर्चा होते. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला, असं वक्तव्य एका बोलताना त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.
स्वर्गीय विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त केले.
संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळप्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून शिकलो असे, असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद का स्विकारले होते, त्याबाबतही भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची संधी मला मधल्या काळात मिळाली होती. आपण ज्या संस्कारातून आलो त्या संस्कारात पदाला महत्त्व नाही हे मी माझ्या मनावर कायमचे बिंबविले आहे. कोणतेही पद हे आपल्या सुखासाठी नाही तर ज्यांच्यासाठी आपण पदावर आलो, त्या घटकांना सुखी करण्याचे पद हे माध्यम आहे अशी माझी मनापासून धारणा आहे. या धारणेमुळे मी तेव्हा मुख्यमंत्री पद स्वीकारले नाही.
बाहेर राहूनच आपण चांगले काम करु, असा माझा त्यावेळी समज होता. परंतु सत्ताबाह्य राहून लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या केंद्रातून कामे करण्यापेक्षा सत्तेत उपमुख्यमंत्री राहून लोकशाहीच्या मूल्यात्मक आदरापोटी ती जबाबदारी स्वीकारली, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
राजकारणात कोणीही कायमचे शत्रू नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला, असे म्हणत त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केले.





