हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिवारात सोमवारी (दि. २२) सायंकाळी ढगफुटीसदृश पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात सुमारे १५० शेतकरी आणि शेतमजूर अडकले होते. ग्रामस्थांनी तत्काळ पुढाकार घेत दोरी आणि मानवी साखळीच्या साह्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. वसमत तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. पांगरा शिंदे शिवारात दुपारी जोरदार पावसाने ओढे तुडुंब भरून वाहू लागले. सायंकाळी पाचच्या सुमारास शेतात काम करणारे १५० हून अधिक शेतकरी आणि मजूर ओढ्याच्या पलीकडे अडकले. पाण्याचा प्रवाह वाढत असताना त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु पुराचा जोर वाढल्याने ते अडकले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मानवी साखळी तयार करून आणि दोरीच्या साह्याने त्यांनी सर्वांना एक-एक करत सुरक्षित ठिकाणी आणले. या बचावकार्यात ग्रामस्थांच्या तत्परतेचे आणि एकजुटीचे कौतुक होत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.