बारामती : मागील काही दिवसांपासून हवामानात होणार्या बदलामुळे ग्रामीण भागात ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी ऊन; तर रात्री हवेतील गारवा, पुन्हा पहाटेच्या सुमारास थंडी असे वातावरण अनेकांच्या प्रकृतीवर परिणामकारक ठरू लागले आहे. मागील काही दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुले, तसेच ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी हवेत बदल होत असल्याने अचानक थंडीही जाणवत असल्याने अनेकांना सर्दी, खोकला तापाने ग्रासले आहे.