“छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान मुघलांनीही केला नव्हता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा”

Sanjay Raut On Eknath Shinde | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पुतळ्याचे डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. अशात सोमवारी 26 ऑगस्ट रोजी समुद्र किनारी असलेला पुतळा पडल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान मुघलांनीही कधी केला नव्हता, महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. Sanjay Raut On Eknath Shinde |
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“सिंधुदुर्ग किल्ल्यावर गद्दारांच्या सरकारने बांधलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. कारण तो चांगल्या मनाने नाही, तर राजकीय मनाने बांधला होता. तुम्ही महाराष्ट्राच्या भावनांशी खेळलात, सर्वात आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान मुघलांनीही कधी केला नव्हता. १९५६ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, मात्र तो पुतळा अजूनही त्याच स्थितीत मजबूत आहे, ” असा दाखलाही संजय राऊत यांनी दिला.
यावेळी संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरून देखील राज्य सरकारवर निशाणा साधला. “ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात. लाडकी बहिण बोलता पण आमच्या लाडक्या राजाला सांभाळू शकला नाही. यावर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी या विषयाचा गांभीर्याने विचार करत आहे. महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार सुरू आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या सर्व गोष्टी जनतेसमोर आम्ही सांगणार आहोत,” असं त्यांनी सांगितले. Sanjay Raut On Eknath Shinde |
लाखो कोटी रुपयांचा घोटाळा केला
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त केले पाहिजे. त्यांनी शिवरायांनाही सोडलं नाही. सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामातही लाखो कोटी रुपयांचा घोटाळा केला. आपापल्या लोकांना टेंडर आणि कामं दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की तिथे हवा जास्त आहे, पण तिथे हवा जास्त नाहीये, तर हवा त्यांच्या डोक्यात गेली, म्हणून ते जमिनीपासून वर उडत आहेत. Sanjay Raut On Eknath Shinde |
घाई गडबडीत लोकसभा निवडणुकांआधी अनावरण केले
नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदलाच्या कार्यक्रमात पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते. घाई गडबडीत लोकसभा निवडणुकांआधी अनावरण करण्यात आलं. कारण श्रेयवादाची लढाई होती. शिवरायांचे वंशज असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी घाई करु नका, असंही सांगितलं होतं. पंतप्रधान हात लावतात, ते उद्ध्वस्त होते, माती होते. राम मंदिर, संसद भवन, कोस्टल रोड, आणि आता शिवरायांचा पुतळा,” असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
हेही वाचा:
बाजाराची सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीसह ओपनिंग ; मात्र बाजार पुन्हा घसरणीकडे परतला.





