Chhagan Bhujbal : मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया देत घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.
अभिषेक घोसाळकर प्रकरणी प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी, “लोकांच्या डोक्याला झालंय तरी काय? मला कळत नाही, फेसबुक लाईव्ह करतात आणि अशा घटना घडतात. यात पोलीस तरी काय करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. जर चोऱ्या. दंगल अशा घटना घडत असतील तर त्यात पोलीस संरक्षण देत असतात, इथं तुमच्या घरात येऊन अशा घटना घडतात. पोलिसांनी बंदूक लायसन्स देताना अधिक काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
भुजबळ पुढे म्हणाले की, अनेक वाम मार्गाने जाणारे, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना बंदूक देऊ नये. मॉरिस जेलमध्ये होता, त्याच्याकडं बंदूक कसे आलेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गृहमंत्री यात काय करू शकतात. राजीनामा मागणी चुकीचे आहे. आतंकवाद, दंगे, चोऱ्या अशा ठिकाणी गृहमंत्री काळजी घेऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मंडल आयोगालाच चॅलेंज करतो असे म्हटले होते यावर छगन भुजबळ यांनी,”मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या या मागणीला आमचा पाठींबा आहे. झुंडशाही आणि बॅक डोअर एन्ट्रीला विरोध आहे. ओबीसी आरक्षण मंडळ आयोगाचा भाग आहे. जर मंडळ आयोग गेला तर त्यांचे आरक्षण राहील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.