– अमित डोंगरे
भारतीय फलंदाजांवर असा आरोप केला जातो की जेव्हा संघातील स्थान धोक्यात आले की ते मोठी खेळी करतात. आता भारतीय संघाचे चाहते त्यावर संताप व्यक्त करतील पण काही प्रमाणात का होईना हे खरे असल्याचे सिद्ध होते. आता इंग्लंडविरुद्धच्याच दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची खेळी पाहिल्यावर हेच मनात येते. खेळी ही संघाच्या फायद्यासाठी व्हावी संघातील स्थान टिकविण्याच्या स्वार्थासाठी नव्हे.
ही मालिका सुरू झाली तेव्हापासूनच मधल्या फळीतील फलंदाज कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व काही प्रमाणात ऋषभ पंत यांच्याकडूनच संघाच्या धावसंख्येची जबाबदारी राहणार हे स्पष्ट होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. नाही म्हणायला पंतने उपयुक्त फलंदाजी केली. मात्र, त्यालाही केव्हा धोका पत्करायचा नाही व आक्रमण केव्हा करायचे हे कधी लक्षात येणार हे सांगायला आता ज्योतिषाचीच गरज लागेल. कोहलीबद्दल काय बोलावे. त्याच्याकडे तंत्र आहे, जिगर आहे, दर्जा आहे, महानता आहे, क्रिकेटच्या सामन्यात फटकावले जातात ते सगळे फटके आहेत फक्त खांद्यावरचा जो भार वापरायचा असतो तोच आहे का नाही असे वाटू लागले आहे. इंग्लंडच्या संघात जेम्स अँडरसन वगळता एकही त्रासदायक गोलंदाज नाही.
स्टुअर्ट ब्रॉडही या सामन्यात खेळलेला नाही. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल, पावसाळी वातावरणाचा गोलंदाजांनाही लाभ होत नाही असे सगळे आपल्याला फायदेशीर व्यसपीठ असतानाही जर कोहली धावा करत नसेल तर मग कधी आणि कुठे करणार. गेल्या दीड वर्षात शतक नाही आता तर तो अर्धशतकही करेनासा झाला आहे. या मालिकेत उर्वरित लढतींत तरी तो चमक दाखवणार का हात हलवत परत येणार हेच पाहावे लागेल.
दुसरीकडे सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चमक दाखवली आहे. राहुलने मोठी खेळी केली आता त्याच्यासह रोहितनेही उर्वरित मालिकेत सातत्य दाखवले तरच संघाला मानहानिकारक पराभवापासून वाचवता येईल. पण सर्वात महत्त्वाचे ते पुजारा व रहाणे यांच्या फलंदाजीचे वाटते. या दोन फलंदाजांना मर्यादित षटकांच्या सामन्यात संघात सातत्याने स्थान मिळत नाही केवळ कसोटी फलंदाज अशी त्यांची ओळख पण आता तर ते कसोटीतही धावा करत नाहीत मग त्यांना संघात ठेवण्यामागे काय विचार किंवा प्रयोजन आहे.
यंदाच्या वर्षापासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका वगळता त्यांच्याकडून मोठी खेळी झालेली नाही. आता या मालिकेतही ते अपयशीच ठरत आहेत. आता दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पुजाराने चाळीशी पार केली तर, रहाणेने अर्धशतकी पल्ला गाठला. मात्र, त्याचा उपयोग काय तर शून्य. खेळी ही वेळेला झाली पाहिजे. संघातील स्थान धोक्यात आल्यावर झालेली खेळी ही संघहित नव्हे तर स्वार्थ ठरते.
आता सूर्यकुमार यादव व पृथ्वी शॉ तिसऱ्या कसोटीपासून संघात दाखल होण्यासाठी उपलब्ध असताना पुजारा व रहाणे यांना संघातील जागा गमवावी लागणार हे दिसत आहे पण तरीही असे वाटते अंतिम संघात कोणीही असो त्याने संघहितासाठी खेळी करण्यावर भर द्यावा संघातील स्थान टिकवण्यासाठी नव्हे. खेळी केली तर संघातील स्थान टिकणारच आहे. पराभव झालेल्या सामन्यात केलेले अर्धशतक किंवा शतक हे वरातीमागून घोडाच ठरते.