Chandrashekhar Bawankule : परभणी जिल्ह्यातील 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून येथील महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी प्रक्रियेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मंत्री बावनकुळे यांच्यासोबत मंत्रालयात परभणी जिल्ह्यातील महामार्गातील भूधारक शेतकऱ्यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. हा महामार्ग राज्यातील विविध जिल्ह्यातून जात असून यासाठी मोजणी प्रक्रिया 60 ते 70 टक्के पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात भूसंपादनासाठी 90 टक्के मोजणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात गावातील बहुसंख्य जमीन ही शेतीसाठी असून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन व मोजणीस विरोध आहे. याप्रसंगी खासदार जाधव यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मोजणी प्रक्रियेस होत असलेल्या विरोधाबाबत माहिती दिली. तसेच विविध शेतकरी यांनी आपली बाजू मंत्री बावनकुळे यांच्यासमोर सादर केली. तसेच, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जेएनपीटी ते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 पागोटे ते चौक हा ग्रीन फील्ड कॅरिडॉर वेगात पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे बावनकुळे यांनी सांगितले.