Chandrashekhar Bawankule : “विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधी…”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
Chandrashekhar Bawankule : 'काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचवण्याची अधिक चिंता'

Chandrashekhar Bawankule : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करुन राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा डाव हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शासकीय वसतिगृहांच्या प्रवेशातील वयाची अट रद्द करणे, रिक्त पदांची भरती आणि इतर मूलभूत मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे पुणे, नाशिक व नागपूर येथे आंदोलन व आमरण उपोषण सुरु आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले होते. यावरून आता बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर हल्लाबोल केला.
National Sports Day : चिंतामणी राऊतचे ‘गोल्ड’ मिशन
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत लिखित आश्वासनही दिले आहे. सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करु शकते, गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे तर हजारव्यांदा संवाद साधण्याचीही तयारी ठेवते. मग प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट का? असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा उद्देश आहे. मात्र काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचवण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला.
‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका’
आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी खरोखरच काँग्रेसला आस्था असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. राहुल गांधींच्या राजकीय पुनरागमनासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करणे महाराष्ट्र कदापी स्वीकारणार नाही, असेही बावनकुळेंनी म्हणाले.
हेही वाचा:






