Chandrashekhar Bawankule : कोर्टाची चपराक..! सत्य बाहेर आलं, आता काँग्रेसनं माफी मागावी, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

Chandrashekhar Bawankule On Malegaon Blast Case Verdict : मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने जाहीर केला. या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर 101 जण जखमी झाले होते. तब्बल 17 वर्षांनंतर विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या निकालावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं, असं बावनकुळे म्हणाले.
पुढे म्हणाले, याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही…न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.





