Chandrashekhar Bawankule : जलजीवन मिशनची कामे 10ऑगस्टपर्यंत पूर्ण करा; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

नागपूर : जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची प्रलंबित कामे 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
या बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खा. श्यामकुमार बर्वे, आ. विकास ठाकरे, आ. संजय मेश्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते. बावनकुळे यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या १३२० योजनांची कामे गुणवत्तापूर्णरीत्या आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
तसेच प्रलंबित योजनांचा नवा खर्च आराखडा तयार करून त्वरित निविदा प्रक्रिया राबवावी असेही निर्देश त्यांनी दिले. एका कंत्राटदाराला दोनपेक्षा अधिक कामे देऊ नयेत, प्रत्येक काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे, तसेच जलस्रोत कोरडे पडलेल्या गावांत तातडीने बंधारे बांधावेत व जल पुनर्भरणाचे उपाय करावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
बावनकुळे यांनी यावेळी महावितरणकडून पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक असलेल्या वीजजोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. अतिरिक्त रोहित्रे बसवणे आणि गावोगावी वीज व्यवस्थापन मजबूत करणे याबाबतही सूचनांचे पालन करण्यास सांगितले. गावोगावांमध्ये जाऊन जनतेशी ३ संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना दिले.





