Chandrashekhar Bavankule on Devendra Fadanvis – एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येतील असे कयास बांधण्यात येत होते. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ऐन वेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करत सर्वांनाच धक्का दिला. शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्याला आता अनेक महिने उलटले आहेत, परंतु फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याची सल आजही राज्यातील भाजप नेत्यांमध्ये असल्याचे दिसते. याचाच प्रत्यय आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यातून आला.
नागपुरात एका कार्यक्रमावेळी बोलताना बावनकुळे यांनी, ‘मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत.’ अशी इच्छा बोलून दाखवली. विशेष म्हणजे बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस हे देखील मंचावर उपस्थित होते.
काय म्हणाले बावनकुळे?
“जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्यान देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात.”
दरम्यान, महाराष्ट्र भाजप अध्यक्षांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल तर आहे ना याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांनी यावरून एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी या वक्तव्यावर भाष्य करताना, याबाबतचा निर्णय शिंदे व फडणवीस घेतील अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आल्याने आता विधिमंडळामध्ये याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.