नवी दिल्ली – लोकसभा निवडणूकीसाठीची आचार संहिता संपेपर्यंत केंद्रीय सुरक्षा दलांना पश्चिम बंगालमध्येच राहू द्यावे, अशी आग्रही मागणी भाजपने निवडणूक आयोगाला केली आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसकडून मतदान संपल्यानंतरही मतदारांच्या गटाला लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती भाजपने व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात 9 मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले असल्याने ही मागणी केल्याचे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या निर्मला सितारामन यांनी पत्रकारांना सांगितले.
भाजपच्या उमेदवारांवर हल्ले झाले. तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते मतदारांना मारहाणही करत होते. मतदान संपल्यानंतर तृणमूलकडून मतदारांना लक्ष्य केले जाईल. त्यामुळे आचार संहिता संपेपर्यंत केंद्रीय सुरक्षा दलांना पश्चिम बंगालमध्येच राहू द्यावे, असे त्या म्हणाल्या. मतमोजणी जरी 23 मे रोजी होणार असली, तरी आचार संहिता 27 मे पर्यंत लागू राहणार आहे.