नवी दिल्ली : केंद्र सरकारने अफगाणिस्तान संकटावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (26 ऑगस्ट) रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त देशाच्या घडामोडींबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती देण्यास परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी या प्रकरणी अधिक तपशील देतील असेही त्यांनी ट्विट करुन सांगितले आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एस जयशंकर यांच्या ट्विटरवरील पोस्टवर त्यांनी विचारले की पंतप्रधान मोदी या विषयावर का बोलत नाहीत किंवा त्यांना अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे याची कल्पना नाही का?
17 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी या विषयावर कॅबिनेट समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या दरम्यान, त्यांनी अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याची खात्री करण्यास सांगितले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, पंतप्रधान म्हणाले की भारताने केवळ आपल्या लोकांचे रक्षण केले पाहिजे असे नाही, तर आपण शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांना आश्रय दिला पाहिजे जे भारतात येऊ इच्छितात. आपल्याला अफगाणिस्तानच्या बंधू -भगिनींनाही शक्य ती मदत करणे गरजेचे आहे. जे यासाठी भारताकडे बघत आहेत.
दरम्यान आज दिल्ली मध्ये मागील पाच ते दहा वर्षा पासून राहणाऱ्या अफगाणि नागरिकांनी दुतावासाबाहेर आंदोलन केले.वसंत विहार, येथील कार्यालयाबाहेर शेकडो अफगाण निर्वासितांनी निदर्शने केली. हे लोक 5-10 वर्षांपासून येथे राहत आहेत आणि त्यांना संयुक्त राष्ट्रांनी निर्वासित कार्ड जारी करावे अशी त्यांची मागणी आहे.
अफगाणिस्तानातील मुस्लिम निर्वासित जे येथे राहतात किंवा जे आता येत आहेत, त्यांना भारतात नागरिकत्व मिळण्याची अपेक्षा नाही. त्यांचे म्हणणे आहे की, जर त्यांना हे कार्ड मिळाले, तर त्यांना इतर काही देशात नागरिकत्व मिळण्यास मदत होईल. हे कार्ड मिळाल्यानंतरच ते भारतातून हलू शकतील.