हरिहरेश्वर येथे महिलेला चिरडल्याचे प्रकरण; हल्लेखोर पर्यटकांना तीन दिवसांची कोठडी

रायगड – हॉटेल रुम मधील भाड्याच्या रकमेवरून झालेल्या वादातून एका महिलेला पर्यटकांनी अंगावर गाडी घालून चिरडून मारल्याची घटना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे घडली होती. या गुन्ह्यातील तीन हल्लेखोर पर्यटकांना श्रीवर्धन न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर अन्य सात आरोपी अद्यापही फरार आहेत.
ज्योती धामणस्कर या महिलेची पिंपरी चिंचवड येथून आलेल्या पर्यटकांनी गाडीखाली चिरडून हत्या केली होती. या प्रकरणी पोलीसांनी इरप्पा यमनप्पा धोत्रे, आकाश गोविंद गावडे, विकी प्रेमसिंग गिल या तिघांना रविवारी सायंकाळी अटक केली होती. या तिघांना आज श्रीवर्धन येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने तिघांनाही २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेतील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून त्यांचा शोध सरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी दिली.




