Harshwardhan Sapkal : कोकाटेंची आमदारकी रद्द करुन हकालपट्टी करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ आक्रमक

मुंबई : रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला आहे. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता पण तसे झाले नाही.
आता राज्यपाल यांनीच या प्रकरणात लक्ष घालून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला सपकाळ यांनी भेट दिली, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या एका बोगस प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठवली असता सचिवालयाने अर्ध्या रात्रीच त्यांची खासदारकी रद्द केली.
त्यानंतर त्यांचे शासकीय घरही सोडण्यास भाग पाडले तसेच काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनिल केदार यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली पण माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत वेगळा न्याय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय कसा, असा प्रश्न विचारून कोकाटे प्रकरणात सरकार लोकशाही पद्धतीने वागत नाही असे सपकाळ म्हणाले.





