Business News: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विस्कळीत होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही भीती अनाठायी आहे. उलट भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात संधी ऊलब्ध होणार आहेत. मात्र भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना आपल्या कामाचे स्वरूप एआय केंद्रित करावे लागणार आहे. भारतीय कंपन्या ते करीत आहेत असे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संघटना नॅस्कॉमने म्हटले आहे. उलट भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी इतर देशापेक्षा जास्त पात्र आहेत. गेल्या दहा वर्षापासून भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी हा लाभ घेण्यासाठी स्वतःला तयार केले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकर्या जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नवे तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या कर्मचार्यांना केवळ भारतातच नाही तर जगभरात या तंत्रज्ञानावर आधारित काम करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत असे नॅसकॉमचे कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग प्रमुख अनिकेत बोस यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जगभरात विकसित होत आहे. चीन, अमेरिका, युरोप, भारत या क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र या विकसित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारीही लागणार आहेत. भारतामध्ये अशा प्रकारच्या कर्मचार्यांची संख्या अमाप आहे. भारतीय आयटी कर्मचारी या तंत्रज्ञानाचा वापर जास्त परिणामकारकरीत्या करू शकतात आणि ते करतील. त्यामुळे या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ भारत जगाला उपलब्ध करणार आहे असे ते म्हणाले. नवे तंत्रज्ञान आयटी कर्मचार्यांनी आत्मसात करावे यासाठी आयटी कंपन्या बरोबरच भारत सरकारही तितकेच संवेदनाशील आहे. सध्या आयोजित केली जात असलेली शिखर परिषद हे त्याचेच उदाहरण आहे. आगामी काळात भारत या क्षेत्रात गाफील राहणार नाही असे त्यांनी सांगितले. भारतीय तंत्रज्ञान हे सर्वसामान्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने विकसित केले जात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. नवे तंत्रज्ञान येथे तेव्हा थोडावेळ असा गोंधळ निर्माण होतो. तसा आता निर्माण झाला आहे. मात्र भारत ज्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करत आहे. त्याप्रमाणे बुद्धिमत्ता क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.