Bronco Test : भारतीय क्रिकेटपटूंसाठी आता ब्रोंको चाचणी अनिवार्य; काय आहे ती आणि का लागू केली? जाणून घ्या

ब्रोंको चाचणीचा प्रस्ताव कोणी दिला?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ब्रोंको चाचणीचा प्रस्ताव स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स यांनी मांडला. ले रॉक्स यंदा जूनमध्ये भारतीय संघाशी जोडले गेले असून, यापूर्वी 2000 च्या दशकातही त्यांनी भारतीय संघासोबत काम केले आहे. याशिवाय, दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघ, केकेआर आणि पीबीकेएस यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि बीसीसीआयने याची अंमलबजावणी केली. यापुढे खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे मूल्यमापन यो-यो चाचणी, 2 किलोमीटर वेळबद्ध धाव आणि ब्रोंको चाचणी या तिन्ही निकषांवर आधारित असेल.
ब्रोंको चाचणी म्हणजे काय?
ब्रोंको चाचणी ही परंपरेने रग्बी खेळात वापरली जाते. यामध्ये खेळाडूला प्रथम 20 मीटर शटल धाव पूर्ण करावी लागते, त्यानंतर 40 मीटर आणि 60 मीटर धावावे लागते. या तिन्ही धावांचा एक संच तयार होतो आणि खेळाडूला न थांबता असे 5 संच पूर्ण करावे लागतात. यासाठी 6 मिनिटांची वेळमर्यादा आहे, ज्यामध्ये खेळाडूला एकूण सुमारे 1200 मीटर धावावे लागते. ही चाचणी बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स येथे सुरू झाली असून, काही वरिष्ठ खेळाडूंनी येथे ही चाचणी दिली आहे.
ब्रोंको चाचणीचा निर्णय का घेतला?
ब्रोंको चाचणीचा निर्णय सहजासहजी घेतला गेला नाही. अलीकडील इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान संघ व्यवस्थापनाने लक्षात घेतले की, काही जलदगती गोलंदाजांचा तंदुरुस्तीचा स्तर उच्च प्रतीचा नाही. मोहम्मद सिराज हा एकमेव जलदगती गोलंदाज होता ज्याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या सर्व 5 सामन्यांमध्ये भाग घेतला. यामुळे जलदगती गोलंदाजांच्या तंदुरुस्तीबाबत चिंता वाढली. इंग्लंड दौऱ्यानंतर ले रॉक्स यांनी ब्रोंको चाचणीचा प्रस्ताव मांडला, ज्यामुळे जलदगती गोलंदाजांना त्यांचे धावण्याचे कार्यभार आणि क्षमता वाढवता येईल.
हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने घेतला धक्कादायक निर्णय! एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
तंदुरुस्तीवर विशेष लक्ष –
या चाचणीमुळे भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. विशेषतः जलदगती गोलंदाजांच्या शारीरिक क्षमतेवर याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या या पावलामुळे भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमपणे कामगिरी करेल, अशी आशा आहे.





