Uttarakhand : उत्तराखंडमधील बोगस कॉल सेंटर उघड; मुंबई पोलिसांची कारवाई, ११ जणांना अटक
एका खाजगी विमान कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काही लोकांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप या महिलेने केला होता.

Uttarakhand – मुंबई पोलिसांनी डेहराडूनमधून चालवल्या जाणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. एका स्थानिक रहिवाशाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, नोकरीच्या शोधात असलेल्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
मानखुर्द पोलीसांच्या माहितीनुसार, एका महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या बोगस सेंटरचा प्रकार उघडकीस आला. एका खाजगी विमान कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काही लोकांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप या महिलेने केला होता. (Uttarakhand)
भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून आरोपींनी तिला त्यांच्या बँक खात्यात सुमारे २.५ लाख रुपये जमा करण्यास प्रवृत्त केले होते. मात्र, नोकरी मिळाली नाही आणि आरोपींनी तिला प्रतिसाद देणे बंद केले, तेव्हा त्या महिलेने मुंबईतील मानखुर्द पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासानंतर, मुंबई पोलिसांच्या एका पथकाने उत्तराखंडच्या राजधानीतील एका ठिकाणी छापा टाकला आणि नोकरी इच्छुकांची फसवणूक करणाऱ्या या बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.
पोलिसांनी या अनधिकृत केंद्राशी संबंधित ११ जणांना अटक केली आणि तेथून नऊ लॅपटॉप, १३ मोबाईल फोन व इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.





