दिवे (पुरंदर) : पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाविरोधात गेली अनेक वर्षे शांततामय आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम शनिवारी (३ मे) अखेर सुटला. प्रशासनाच्या ड्रोन सर्व्हेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा मारा केला, ज्यात अनेक शेतकरी, महिला जखमी झाले. यामुळे प्रक्षुब्ध शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगड आणि मातीचे ढेकळे फेकले. आंदोलनादरम्यान कुंभारवळण येथील अंजना महादेव कामथे (वय ५५) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर एखतपूरच्या विमल बाजीराव मोरे जखमी झाल्या. “आमच्या प्रेतांवरूनच विमानतळ होईल,” अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. शुक्रवारी एखतपूर गावात प्रशासनाने ड्रोन सर्व्हे सुरू केला, पण शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून तो रोखला. सायंकाळी अधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने सर्व्हे पूर्ण केला. शनिवारी उर्वरित गावांचा सर्व्हे सुरू होताच शेतकऱ्यांनी सासवड-वाघापूर मार्गावर वनपुरी चौकात बैलगाड्या लावून नाकाबंदी केली. प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि डीवायएसपी तानाजी बरडे यांच्या फौजफाट्याला कुंभारवळण येथे शेतकऱ्यांनी रोखले. रस्त्यावर लोखंडी खांब टाकून गाड्या अडवण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी खांब हटवत पुढे सरकण्याचा प्रयत्न केला. दुपारी ३ वाजता शेतकऱ्यांनी पोलिसांना मज्जाव केल्याने सौम्य लाठीमारानंतर जोरदार लाठीहल्ला झाला. अश्रुधुराच्या नळकांड्यांनी जमाव पांगवला गेला. यात अनेक तरुण, ज्येष्ठ आणि महिला जखमी झाले. पोलिसांनी ८-१० आंदोलकांना ताब्यात घेतल्याने सायंकाळी ५ वाजता शेतकऱ्यांनी सासवड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. “आटक शेतकऱ्यांना सोडा, गुन्हे दाखल करू नका,” अशी मागणी करत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला. आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव आहे.