Blood Donation : ‘ई-रक्तकोष पोर्टल’ गरजूंना मिळवून देणार रक्त; अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त करा रक्तदान, वाचा रक्तदानाचे फायदे !

Blood Donation Benefits : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरे, तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने काहीदिवसांपूर्वीच ‘ई-रक्तकोष पोर्टल’ विकसित केले आहे. त्यामुळे रक्ताशी निगडित सर्वच आजारांच्या गरजू रुग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ आता कमी होणार असून, त्यांना एका क्लिकवर रक्त उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत असून, राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय, ट्रस्ट, कार्पोरेशन, प्रायव्हेट अशा एकूण ३९५ रक्तपेढ्यांचे/रक्तकेंद्रांचे मोठे जाळे आहे. रुग्णाला वेळेत रक्त मिळण्यासाठी आपल्या मोबाईलवर ‘ई-रक्तकोष पोर्टल’च्या माध्यमातून माहिती मिळणार असून, वारंवार रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. तसेच ज्या रुग्णांचे रक्त निगेटिव्ह गटाचे आहे, त्यांनाही या पोर्टलद्वारे रक्ताच्या उपलब्धतेची माहिती मिळणार आहे.
‘ई-रक्तकोष पोर्टल’चा फायदा कसा होणार :
या पोर्टलद्वारे रक्तदात्यांना जवळचे रक्त केंद्र, रक्तपेढी तसेच रक्तदान शिबिराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, कॅन्सर या रुग्णांना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे. मोठ्या शस्त्रक्रियांच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागते मात्र आता ‘ई-रक्तकोष पोर्टल’च्या माध्यमातून ही धावपळ कमी होणार आहे.
‘ई-रक्तकोष पोर्टल’चा वापर कसा करावा :
सर्वात आधी गूगलवर जाऊन www.eraktkosh.mohfw.gov.in सर्च करा. ‘ई-रक्तकोष पोर्टल’ वर गेल्यानंतर ‘ई-रक्तकोष’या मेनूवर क्लिक करा. आता तुमचे संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर इत्यादी संपूर्ण माहिती भरा. या पोर्टलमध्ये तुमची माहिती समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारातील रक्त हवे किंवा जवळील रक्त केंद्र, रक्तपेढी तसेच रक्तदान शिबिराची माहिती सहज उपलब्ध होईल.
रक्त संकलनामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर :
महाराष्ट्र रक्त संकलनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. मागील वर्षी राज्यात अंदाजे २१ लाख रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्त संकलनातून मोठ्या प्रमाणात रक्त घटक तयार करण्यात आले. ज्यामध्ये पॅक्ड रेड ब्लड सेल, प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट, फ्रेश फ्रोजन प्लाज्मा यांचा समावेश आहे.
‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, महान दान’ या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित होतात. महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, कार्पोरेट कार्यालयांच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत रक्तसंकलन मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र रक्त संकलनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे.
गेल्यावर्षी राज्यात किती लोकांनी रक्तदान केलं? ‘या’ लोकांची संख्या सर्वाधिक :
मागील वर्षी राज्यात अंदाजे २१ लाख रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, शंभरपेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची मोठी संख्या मोठी आहे. सुदृढ रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो. रक्तदान करण्याचे अनेक फायदे असून यावर देखील आपण बोलणार आहोत.
पहिला जागतिक ‘रक्तदान दिन’, कसा सुरु हा दिवस :
पहिला जागतिक रक्तदान दिन मर्यादित स्वरुपात २००४ मध्ये साजरा करण्यात आला. पुढे २००५ मध्ये, ५८ व्या जागतिक आरोग्य संमेलनादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून जगभरात दरवर्षी १४ जून रोजी हा दिवस ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
रक्तदान कोण करू शकतो हे ठरविण्यासाठी काही मूलभूत अटी आहेत. हे रक्तदाता आणि रक्त घेणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी खूपच महत्वाचे आहे….
रक्तदानासाठी पात्रता :
– रक्तदात्याचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान असावे. काही देशांमध्ये पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांसाठी कमाल वय ६० असते.
– रक्तदात्याचे वजन किमान ५० किलो असावे. कमी वजन असल्यास रक्तदानानंतर अशक्तपणा येऊ शकतो.
– पुरुषांसाठी: किमान १३ ग्रॅम/डेसिलिटर. आणि महिलांसाठी: किमान १२.५ ग्रॅम/डेसिलिटर. कमी हिमोग्लोबिन असल्यास रक्तदान करता येत नाही.
– पुरुष दर ३ महिन्यांनी (९० दिवस) आणि महिला दर ४ महिन्यांनी (१२० दिवस) रक्तदान करू शकतात.
कोण रक्तदान करू शकत नाही?
– मधुमेह (इन्सुलिन घेत असल्यास), हृदयरोग, कर्करोग, क्षयरोग, एचआयव्ही/एड्स, मलेरिया यांसारखे आजार असलेले नागरिक रक्तदान करू शकत नाहीत.
– गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर ६ महिन्यांपर्यंत आणि स्तनपान काळात रक्तदान करता येत नाही.
– मासिक पाळीदरम्यान किंवा लगेच नंतर रक्तदान करणे टाळावे.
– काही औषधे (उदा. अँटिबायोटिक्स) घेत असल्यास किंवा कोविड-१९ लस घेतली असल्यास ठराविक कालावधीनंतरच रक्तदान करता येते.
– मद्यपान किंवा ड्रग्जचे व्यसन असलेले किंवा रक्तदानाच्या २४ तास आधी मद्यपान केलेले लोक रक्तदान करू शकत नाहीत.
– टॅटू किंवा पियर्सिंग केले असल्यास ६ महिने ते १ वर्ष थांबावे लागते, कारण संसर्गाचा धोका असू शकतो.
रक्तदानापूर्वी काय करावे?
– पुरेशी झोप घ्यावी.
– पौष्टिक आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावे.
– डॉक्टरांना आपला वैद्यकीय इतिहास सांगावा. त्यांचा सल्ला घ्या.
महिलांनी रक्तदान करण्याचे फायदे :
– रक्तदानामुळे महिलांचेही रक्त संतुलित राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.
– रक्ताची गरज सर्वांसाठी असते, आणि महिलांचे रक्तदान गर्भवती महिलांसह इतर रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते.
– रक्तदान करून महिला स्वतःला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून पुढे आणू शकतात.
– महिलांनी दर ४ महिन्यांनी रक्तदान करावे, कारण त्यांचे शरीर रक्तपेशी पुन्हा निर्माण करण्यास थोडा जास्त वेळ घेते.
गैरसमज-अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त करा रक्तदान करा…
रक्तदानाबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत, ज्यामुळे लोक रक्तदान करण्यास संकोच करतात. त्यामुळे या अफवांवर विश्वास न ठेवता आपण रक्तदान करायला हवे.
– रक्तदान केल्याने शरीर कमजोर होते. मात्र रक्तदान केल्यानंतर शरीर २४ तासांत प्लाझ्मा आणि ४-६ आठवड्यांत रक्तपेशी पुन्हा निर्माण करते. निरोगी व्यक्तीवर याचा दीर्घकालीन परिणाम होत नाही.
– रक्तदान करणे वेदनादायक असते. रक्तदानादरम्यान फक्त सुई टोचल्याची थोडीशी जाणीव होते, जी सहन करण्यायोग्य असते. संपूर्ण प्रक्रिया वेदनारहित आणि सुरक्षित असते.
– रक्तदानामुळे रोग पसरतात. रक्तदान केंद्रांमध्ये नवीन, निर्जंतुक सुई वापरली जाते, त्यामुळे संसर्गाचा धोका नसतो. कोणताही रोग पसरत नाही.
– प्रत्येकजण रक्तदान करू शकतो. प्रत्येकजण रक्तदान करू शकत नाही. वय, वजन, आरोग्य आणि वैद्यकीय इतिहास तुमची पात्रता ठरते. (उदा., गर्भवती महिला, कमी हिमोग्लोबिन असलेले लोक रक्तदान करू शकत नाहीत.)
– रक्तदानासाठी खूप वेळ लागतो. रक्तदानाची प्रक्रिया फक्त १०-१५ मिनिटे लागते, तर संपूर्ण तपासणी आणि विश्रांतीसह ३०-४५ मिनिटांत काम पूर्ण होते.
– वारंवार रक्तदान केल्याने रक्त कमी पडते. निरोगी व्यक्ती दर ३ महिन्यांनी (पुरुष) किंवा ४ महिन्यांनी (स्त्रिया) रक्तदान करू शकते.
“दान करा रक्ताचे, वाचेल आयुष्य एखाद्याचे…”
रक्तदान संदर्भात आपल्या समाजात आज देखील अनेक गैरसमज आणि खोट्या अफवा पसरवल्या जातात. मात्र यासगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक जबादार नागरिक म्हणून आपण या मोहिमेत सामील होणे ही काळाची गरज आहे. आणि इतरांना देखील या मोहिमेचा एक भाग करून घेणे ही सुद्धा आपलीच जबादारी आहे. रक्तदान अनमोल आहे. आपले मौल्यवान रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. त्यामुळे “दान करा रक्ताचे, वाचेल आयुष्य एखाद्याचे…” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.






