BJP Protest: संसदेत १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला खीळ बसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आज विरोधकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीचे हे विधेयक मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यामुळे लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने फेटाळले गेले. यानंतर भाजपने ‘इंडिया’ (INDIA) आघाडीला ‘महिला विरोधी’ ठरवत देशभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाचा मुख्य रोख काँग्रेसवर (BJP Protest) दिल्लीत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला. भाजप नेत्यांनी हातांत फलक घेऊन काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांविरुद्ध घोषणाबाजी केली. काय आहे वादाचे मुख्य कारण? (BJP Protest) महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी पंतप्रधान मोदींनी हे विधेयक आणले होते. काँग्रेसने केवळ राजकारण करण्यासाठी आणि महिलांचे हक्क हिरावण्यासाठी विरोधात मतदान केले, असा भाजपने दावा केला आहे. हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार तर काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने स्पष्ट केले की, त्यांचा महिला आरक्षणाला विरोध नाही. मात्र, या आरक्षणाची अंमलबजावणी ‘मतदारसंघ पुनर्रचने’शी (Delimitation) जोडण्याला त्यांचा विरोध आहे. लोकसभा जागांची संख्या ८१५ पर्यंत वाढवण्याच्या या प्रक्रियेमुळे दक्षिण भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रतिक्रिया- “काल विधेयक फेटाळले गेले तेव्हा पंतप्रधान मोदींचे डोळे पाणावले होते. त्यांनी आपले अश्रू कसे रोखले हे आम्ही पाहिले आहे. काँग्रेस, सपा, आप आणि तृणमूल काँग्रेसने देशातील महिलांना आव्हान दिले आहे, ज्याला महिला मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देतील.” — मनोज तिवारी, भाजप खासदार “विरोधी पक्षांनी देशातील महिलांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांना महिलांची भूमिका केवळ मतदान केंद्रांपर्यंत मर्यादित ठेवायची आहे. जेव्हा सत्तेत वाटा देण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपला स्वार्थ पाहिला.” — बासुरी स्वराज, भाजप खासदार “आम्ही चर्चेसाठी तयार होतो, पण भाजपने याचे केवळ ‘इव्हेंट’मध्ये रूपांतर केले. आमचा विरोध आरक्षणाला नसून पुनर्रचनेच्या जाचक अटीला आहे.” — इमरान मसूद, काँग्रेस खासदार संख्याबळाचे गणित काल लोकसभेत झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडली. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळू शकल्याने हे विधेयक तांत्रिकदृष्ट्या संमत होऊ शकले नाही. (BJP Protest) पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार या राजकीय पेचप्रसंगानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. महिला आरक्षण विधेयक कोसळण्यावरून ते विरोधकांवर कडक टीका करण्याची आणि सरकारची पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले की, “एका ऐतिहासिक निर्णयाला काँग्रेसने रोखले असून पंतप्रधानांचे संबोधन जनतेला सत्य सांगण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.” (BJP Protest)