…म्हणजे ते मराठी नाहीत का?; गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेला सवाल
मुंबई – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत ? असा सवाल करत पडळकरांनी सेनेला लक्ष केले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेशमा पाटील असे अनेकजण मराठी माणसे वाटत नाहीयेत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत ? मराठी माणसाचा राऊत यांना एवढा आकस का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
“दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़शाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
किंबहूना बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटींच्या पेंग्वीन ‘बालनाट्याच्या शो’ चे तिकीट घेणे नाकारले आहे. असा जोरदार टोला पडळकरांनी लगावला आहे.





