Bihar Election: पशुपति पारस यांच्या RLJP ने सोडली NDA ची साथ, महागठबंधनात जाण्याचे संकेत

पटना – बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (RLJP) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपति पारस यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोठा धक्का दिला आहे. त्यांनी आपला पक्ष NDA मधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी महागठबंधनात सामील होण्याचे संकेत दिले आहेत.
पशुपति पारस काय म्हणाले?
पशुपति पारस म्हणाले, “२०१४ पासून आजपर्यंत आम्ही NDA चे निष्ठावान सहकारी होतो. पण लोकसभा निवडणुकीत आमच्या दलित केंद्रित पक्षासोबत NDA ने अन्याय केला. तरीही आम्ही त्यांना साथ दिली. पण बिहारमधील NDA च्या बैठकींमध्ये आमच्या पक्षाचा उल्लेखही केला गेला नाही. आम्हाला पाच पांडवांमध्ये स्थान दिले गेले नाही.” पारस यांनी NDA ने आपल्या पक्षाची उपेक्षा केल्याचा आरोप केला.
विधानसभा निवडणुकीसाठी तयारी-
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पारस म्हणाले, “आम्ही बिहारमधील २४३ जागांसाठी तयारी करत आहोत. जर महागठबंधनाने योग्य वेळी आम्हाला सन्मान दिला, तर आम्ही भविष्यातील राजकारणावर विचार करू. माझे RJD आणि लालू प्रसाद यादव यांच्याशी सुरुवातीपासून चांगले संबंध आहेत.” त्यांनी सर्व पक्षनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे संकेत दिले.
केंद्रीय मंत्री जीतनराम मांझींची प्रतिक्रिया-
पारस यांच्या NDA सोडण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी म्हणाले, “पारस यांच्या बाहेर पडण्याने NDA ला कोणताही फरक पडणार नाही.” मात्र, राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, जर पारस यांचा पक्ष महागठबंधनात सामील झाला, तर त्यामुळे महागठबंधनाला बळ मिळू शकते. दुसरीकडे, वक्फ कायद्याच्या समर्थनामुळे नीतीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यापासून मुस्लिम मतदार नाराज असल्याचा दावा केला जात आहे.
महागठबंधनाला फायदा?
पारस यांनी अद्याप महागठबंधनात जाण्याची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी त्यांच्या पक्षाच्या समावेशाने महागठबंधनाची ताकद वाढू शकते. लालू प्रसाद यादव यांनाही चुकीच्या निर्णयामुळे सत्ता गमवायची नाही, अशी चर्चा आहे. बिहारच्या निवडणूक रंगमंचावर पारस यांचा हा निर्णय काय परिणाम घडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





