नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने बिहार निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड हे अतिरिक्त कागदपत्र म्हणून स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात आयोगाने म्हटले की, सूचीबद्ध ११ कागदपत्रांव्यतिरिक्त आधार कार्ड १२ वे कागदपत्र म्हणून ग्राह्य मानले जाईल. आयोगाने स्पष्ट केले की, आधार कार्ड हे कायद्याच्या कलम ९ नुसार नागरिकत्वाचा पुरावा म्हणून नव्हे तर ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारले पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. तसेच लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २३(४) अंतर्गत, आधार कार्ड हे एखाद्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांपैकी एक आहे. या निर्देशांनुसार आधार कार्ड स्वीकारण्यास नकार दिल्यास किंवा त्याचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे. दरम्यान, बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेत मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पुरावा म्हणून स्वीकारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी दिले होते. तसेच ९ सप्टेंबरपर्यंत या निर्देशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते.