मुंबई – राज्यातील महापालिका निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.
कोर्टाने निकाल दिल्यानंतर पालिकेला जवळपास 100 दिवस आढावा आणि तयारीसाठी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वॉर्ड रचना, यादी तपासणी, हरकती मागवने, आरक्षण सोडत या बाबींचा समावेश असणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतरच लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसंदर्भात येत्या 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच लागणार असल्याचे बोलले जात आहे. मे महिन्यात निकाल लागला तरी देखील महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल लागल्यानंतर जवळपास 100 दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे.
का रखडल्या निवडणुका?
– महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचना महायुती सरकारने रद्द केली. त्यामुळे प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारचा की निवडणूक आयोगाचा यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
– महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज संस्थांचा सदस्य संख्येमध्ये बदल करण्यात आला होता. त्यावर देखील आक्षेप घेण्यात आला.
– ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज संस्थामध्ये लागू करण्या संदर्भात वाद होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायलयाचा निकाल आला नाही, या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत.