Jaykumar Gore : जयकुमार गोरे प्रकरणात मोठा ट्वीस्ट; रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई : राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे आता राज्याचे माजी विधानपरिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पोहचत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण रामराजे निंबाळकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. उद्या (शनिवारी) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला होता.
या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेले काही कार्यकर्ते यांना नोटिसा बजावल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे विवस्त्र फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा सदर महिलेने केला होता.
तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांसाठी जेलमध्येही जावे लागले, असे या महिलेने एका पत्रात म्हटले होते. यावरून मंत्री गोरेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं, त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
त्याशिवाय, ज्या महिलेने आरोप केल्याचा दावा केलाय जातोय, त्या महिलेशी संबंधित प्रकरण कोर्टाने आधीच निकाली काढण्यत आले असल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी विधानसभेत हक्कभंगही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषा रखरात यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
तसेच या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संबंधित काही नेते गुंतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि तुषार खरात यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याचे सांगितले होते. अशातच आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.





