प्रभात वृत्तसेवा रांजणी – आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्याचे चित्र पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) दृष्टीने अग्निपरीक्षा ठरणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. गेली 35 वर्ष आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काठावर पास व्हावे लागले. वळसे पाटील यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. तरी देखील तालुक्यातील जनतेने वळसे पाटील यांना काठावरच पास केले. आगामी काळात तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील या अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.राज्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तसेच एकनाथ शिंदे गट (शिवसेना) अशी महायुती आहे. मात्र, आंबेगाव तालुक्याचे चित्र पाहता शिवसेना (शिंदे गट) महायुतीपासून अलिप्त राहत असल्याचे पहायला मिळत आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.तालुक्याच्या राजकारणात कदाचित शिवसेना शिंदे गटाने महायुतीत सामील न होता स्वबळावर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. तर त्याची किंमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला मोजावी लागेल. शिवसेनेने महायुतीतून वेगळा निर्णय घेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने घातक ठरू शकते. शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे वळसे पाटील यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत. मात्र, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वळसे पाटील आणि आढळराव पाटील या दोघांच्याही विचाराचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणे गरजेचे आहे आणि तसे झाले, तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होणाऱ्या निवडणुकात निर्णायक मते घेऊ शकतो. दरम्यान तालुक्यातील भाजपचे अस्तित्व देखील हळूहळू वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील टाळून चालणार नाही त्यांना देखील विश्वासात घेणे गरजेचे आहे. तालुक्यात महायुतीत असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारात घेत नाही, असा आरोप सातत्याने होत आहे. किंबहुना आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात शिवसेना एकनाथ शिंदे गट विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाबरोबर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गट कुठे जाणार.. दरम्यान, तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विरोधात तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढले तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या दृष्टीने होणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही अग्निपरीक्षा ठरणार हे नक्की.