प्रभात वृत्तसेवा रांजणी ( रमेश जाधव ) – आंबेगाव तालुक्याची राजकीय राजधानी असलेल्या मंचर नगरपंचायतीची प्रथमच निवडणूक होत आहे .त्या पार्श्वभूमीवर येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. खरे तर मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. जि. प. गट आणि पंचायत समिती गणांसाठी गळ लाऊन बसलेल्यांची संख्या मोठी असल्याने तिथे काही डाळ शिजेल की नाही, त्या अगोदर मंचर नगरपंचायतसाठी अनेकांचे इच्छूकांचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत तिकीट हाडाच्या कार्यकर्त्यांना द्यायचे की लाडाच्या कार्यकर्त्यांना द्यायचे, असा पेच प्रक्षश्रेष्ठींसमोर उभा राहिला आहे.दरम्यान नगरपंचायत निवडणूकच्या पार्श्वभूमीवर मंचर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते. निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून गल्ली, बोळात आता एकच चर्चा रंगली आहे.नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना आता चांगला वेग आला आहे. विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी आपापल्या पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत असल्याचे दिसून येते. काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काहीजण कार्यकर्त्यांसोबत बैठकांचे सत्र घेत आहेत. परिणामी स्थानिक राजकारणात हाडाचे आणि लाडाचे कार्यकर्ते या दोन गटांमध्ये तणाव स्पष्टपणे दिसून येतो. हाडाचे कार्यकर्ते म्हणजे वर्षांनुवर्षे पक्षासाठी निस्वार्थपणे झटणारे आणि प्रचार ते संघटन या सर्व स्तरावर कार्यरत असलेले कार्यकर्ते ! तर लाडाचे कार्यकर्ते हे सहसा नेतृत्वाच्या जवळचे आणि “खास माणसं ” म्हणून ओळखले जाणारे असतात. निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या जवळ राहून प्रभाव दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे हाडाचा विरुद्ध लाडाचा हा संघर्ष आता प्रत्येक पक्षात रंगताना दिसून येत आहे. नावे गुलदस्त्यात… आंबेगाव तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून मंचर शहराकडे पाहिले जाते.तालुक्याचे राजकारण शहरातून चालते, त्यामुळे मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना (उबाठा), शिवसेना, काँग्रेस आणि भाजप, अशा सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज असून इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीगाठीवर आतापासूनच भर दिलेला दिसतो. मात्र, प्रत्यक्षात तिकीट कुणाला मिळणार हे पक्षश्रेष्ठीच ठरवणार असल्यामुळे सध्या तरी इच्छुकांची उमेदवारी गुलदस्त्यात आहे. निवडणुका एकत्र शक्य एकूणच राजकीय दृष्ट्या परंपरेने चुरशीच्या राहिलेल्या मंचर शहरात मुख्य लढत ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात शिवसेना (उबाठा) तसेच भाजप, अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नुवडणुका एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य केले असल्याने संदिग्धता वाढली आहे. मंचर नगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारात रंगत वाढली असून गुप्त बैठका, सोशल मीडिया आणि रणनीती आखणीच्या हालचालींनी निवडणुकीचे चित्र रंगात आले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.