केसीआर यांना मोठा झटका; तेलंगणात ठाकरेंची रणनीती यशस्वी; बीआरएसच्या ३५ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मोठ्या नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे, तर काल तेलंगणाचे मुख्यमंत्री की.चंद्रशेखर राव यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्रात एंट्री करून राज्यातील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश करून घेतला. पण आता बीआरएस पक्षाला त्यांच्याच राज्यात मोठा झटका बसला आहे.
तेलंगणातील अनेक बीआरएस नेत्यांनी काल केसीआर यांची साथ सोडत काँग्रेसशी हातमिळवणी केली. माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बदलाच्या या सोहळ्यामुळे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे. तेलंगणामध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणूक वर्षात अनेक बीआरएस नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बीआरएसच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्विकारले असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगण प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात तेलंगणा काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली. तेलंगणातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी २ जुलै रोजी तेलंगणाचा दौरा करणार असल्याचे समोर आले आहे.
माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणा सरकारचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह किमान ३५ बीआरएस नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत या नेत्यांनी काल पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली. यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच तेलंगणातील खम्मम येथे जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे, ज्याठिकाणी हे सर्व नेते औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





