Bhor News: ‘आंदोलन केलं तरी घाम फुटेना!’ भोरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; पुन्हा आंदोलनाचा इशारा
Bhor News: भोर शहर व परिसरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार सुरूच; भाजपसह विविध संघटनांच्या आंदोलनानंतरही महावितरणच्या कारभारात सुधारणा नाही.

Bhor News – भोर शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सतत वीज खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी, नगरसेवकांनी, विविध संघटनांनी तसेच भाजपने महावितरण कार्यालयावर आंदोलन करूनही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. आंदोलनकर्त्यांना दिलेल्या लेखी आश्वासनाला १२ दिवस उलटूनही वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने ‘आंदोलन करूनही महावितरणला घाम फुटेना’ अशी संतप्त प्रतिक्रिया भोरवासीयांमधून उमटत आहे.
विजेच्या या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी (दि. १८) महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ८ दिवसांच्या आत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, मुदत संपून चार दिवस उलटले तरीही परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही.
व्यावसायिक व नागरिकांचे अतोनात नुकसान
दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने भोरमधील व्यापारी व सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत. फोटोग्राफर, लाँड्री व्यावसायिक, आईस्क्रीम विक्रेते, झेरॉक्स सेंटर, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, पीठ गिरणी आणि हॉटेल व्यावसायिकांना वीज नसल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
फ्रिज बंद पडल्यामुळे केक शॉपमधील खाद्यपदार्थ खराब होत आहेत. वारंवार वीज ये-जा करत असल्याने घरांमधील तसेच दुकानांतील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळण्याचे व नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अभ्यासाच्या वेळीच वीज जात असल्याने विद्यार्थ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
“भोर शहरात सध्या वीज आणि पाणी या दोन्ही गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे दिवसभर लाईटचा लपंडाव सुरू आहे, तर दुसरीकडे पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. ‘वीज नाही म्हणून पाणी नाही’ अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. महावितरणने तातडीने लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
– गणेश पवार, माजी उपनगराध्यक्ष, भोर.





