BJP vs Congress : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला, तरी अनेक ठिकाणी स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेतील घडामोडींनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. महापौर निवडणुकीआधीच समीकरणे बदलली भिवंडी महापालिकेत २० तारखेला महापौर निवडणूक होणार आहे. मात्र कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याच्या स्थितीनुसार काँग्रेसकडे ३० नगरसेवक, भाजपकडे २२, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी १२ नगरसेवक आहेत. दरम्यान, नारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या ९ नगरसेवकांचा गट काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसची ‘सेक्युलर फ्रंट’ रणनीती या घडामोडींवर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भिवंडीत काँग्रेस सर्वाधिक जागांसह पुढे आली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा घेत ‘सेक्युलर फ्रंट’ स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण संख्याबळ ४२ वर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. सपकाळ यांनी स्पष्ट केले की, भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) यांचा अधिकृत पाठिंबा काँग्रेस स्वीकारणार नाही. मात्र भाजपमधून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांशी चर्चा करण्यास ते तयार असल्याचे त्यांनी सांगितले. नारायण चौधरी पूर्वी काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये गेले; आता ते पुन्हा ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे. याआधी अंबरनाथ येथे काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई झाली होती. आता भिवंडीत उलट चित्र दिसत असून भाजपचे ९ नगरसेवक काँग्रेसकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापौर निवडणुकीपूर्वीच बदलणाऱ्या या राजकीय समीकरणांमुळे भिवंडीतील सत्तासंघर्ष चुरशीचा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या राजकारणातही या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.