राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीवरुन राज्य सरकार आणि भाजपमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण आता या प्रकरणावर भीमा-कोरेगाव हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस सरकारवर केला आहे. अनुसूचित जमातीविरोधात वातावरण निर्मितीसाठी भाजपचा डाव होता, असा देखील गंभीर आरोपदेखील त्यांनी केला आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून एनआयएकडे देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणावरून नवाब मलिक यांनी फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे आताच का दिला? राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा तपास एनआयएकडे का दिला नाही? असा प्रश्न नवाब मलिकांनी केला आहे.
दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे पुणे पोलिसांनी एनआयएकडे देण्यास नकार दिला आहे. तपासाची कागदपत्रे न मिळाल्यामुळे एनआयएच्या टीमला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र झाला आहे. एनआयएची टीम तपासाची कागदपत्रे घेण्यासाठी सोमवारी पुण्यामध्ये दाखल झाली होती. मात्र राज्य सरकार आणि पोलिस महासंचालकांच्या परवानगीनंतर आम्ही कागदपत्रांचे हस्तांतर करु, असे पुणे पोलिसांनी सांगितले.