Bhigwan Kidnapping Case – भिगवण येथील गाजलेल्या अपहरण प्रकरणात आज मोठी घडामोड घडली. इंदापूर न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे यापूर्वी तिने संबंधित तरुणासोबत जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेत झालेला हा बदल प्रकरणाला नवे वळण देणारा ठरला आहे. बारामती न्यायालयात याआधी हजर केल्यानंतर मुलीला पाच दिवसांसाठी पुनर्वसन केंद्रात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयात सादर केल्यानंतर तिने स्पष्टपणे आईसोबत राहण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती आईकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलीची पूर्वीची भूमिका आणि त्यानंतरची घडामोड घटनेनंतर काही दिवसांनी संबंधित तरुणी स्वतःहून पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तिने आपले अपहरण झाले नसल्याचा दावा करत प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. या पार्श्वभूमीवर विविध तालुक्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली होती आणि वातावरण अधिकच तापले होते. आता न्यायालयात तिने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयाचा अंतिम आदेश काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमकी घटना काय होती? 17 तारखेला दुपारी सुमारास भिगवण येथे धक्कादायक प्रकार घडला होता. दुचाकीवरून जात असताना आई आणि भावाच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकून 21 वर्षीय मुलीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी झहीर हरून शेख आणि आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) या दोन सख्ख्या भावांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर भिगवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड आणि अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिला होता. जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती.