Bhatghar dam: पाण्याखाली असणारं ‘ते’ रहस्यमय मंदिर अखेर बाहेर! भाटघर धरणात निसर्गाचा अद्भुत चमत्कार
Bhatghar dam: भोर शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण बाजूच्या वेळवंडमधील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी; ग्रामस्थांकडून गाळ काढण्यास सुरुवात.

Bhatghar dam – भाटघर धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होऊ लागला आहे, तसतसे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलमय झालेली पुरातन मंदिरे पुन्हा दृश्यमान होऊ लागली आहेत. धरणाची पाण्याची पातळी खालावल्यामुळे जुन्या वेळवंड (ता. भोर) गावठाणातील ऐतिहासिक पांडवकालीन नागोबाचे मंदिर सध्या नागरिकांना पाहण्यास मिळत आहे.
भोर शहरापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर हे नागोबाचे मंदिर आहे. धरणाच्या दक्षिण बाजूस वेळवंड येथे हे मंदिर असून, धरणाच्या उत्तर बाजूस कांबरे या गावात ‘कांबरेश्वराचे’ मंदिर आहे. दरवर्षी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच या दोन्ही प्राचीन मंदिरांचे दर्शन भाविकांना घेता येते. भाटघर पाणलोट क्षेत्रातील जुन्या वेळवंड गावठाणातील हे पांडवकालीन नागोबाचे मंदिर वर्षातील तब्बल दहा महिने पाण्याखाली असते.
मंदिरासमोर पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी आहे. या संपूर्ण मंदिराचा गाभारा व भिंतींचे बांधकाम दगडात केलेले आहे. पाणी ओसरल्यानंतर वेळवंड गावातील ग्रामस्थ व तरुण मुले दरवर्षी मंदिराच्या गाभाऱ्यातील गाळ काढून परिसराची स्वच्छता करतात. हे प्राचीन पौराणिक मंदिर पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. हा प्राचीन सांस्कृतिक वारसा जतन करणे ही काळाची गरज असल्याचे वेळवंड परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.
धरणाचा इतिहास आणि जुन्या आठवणी
भोर तालुक्यात भाटघर धरणाचे बांधकाम सन १९१२ मध्ये सुरू होऊन १९२८ मध्ये पूर्ण झाले. या धरणाच्या उभारणीदरम्यान सुमारे ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी गावे स्थलांतरित करण्यात आली. गावे दुसरीकडे वसली तरी नागरिकांच्या जुन्या आठवणी आणि गावाच्या खुणा आजही धरणाच्या पोटात सुरक्षित आहेत.

