Maharashtra Politics : सोलापूर जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून पंढरपूरमधील भालके परिवारासह अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. (Maharashtra Politics) डॉ. प्रणिता भालके, अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या वेळी शिंदे यांनी “मूळ शिवसेना कोणाची हे जनतेने ठरवलं आहे” असे ठाम विधान केले. भगीरथ भालके यांच्या प्रवेशाचा संदर्भ देताना शिंदे म्हणाले, “तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी…,” आणि त्यानंतर त्यांनी तत्काळ शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. (Maharashtra Politics) पंढरपूरच्या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हा पक्षवाढीचा मंत्र दिला. “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” या सूत्रावर भर देत प्रत्येक कार्यकर्त्याने जनसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला प्रकाश आबिटकर, भारतशेठ गोगावले, तानाजी सावंत, धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी भालके यांच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात विकासाची गंगा वाहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच हिंदुत्व, विकास आणि जनसेवेच्या मुद्द्यांवर शिवसेना अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले. या मोठ्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)