कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाता येथे शहीद दिनानिमित्त आयोजित सभेत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजप सर्वत्र सरकार पाडण्यात व्यस्त आहे, तेच त्यांचे काम असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. महागाई आणि जीएसटीच्या मुद्द्यावरही ममता यांनी केंद्रावर ताशेरे ओढले.
हजारो लोकांच्या रॅलीला संबोधित करताना भाजपचे नाव न घेता, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये त्यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. इथे पाऊस पडतोय आणि रस्ते जलमय झालेत पण आमचे समर्थक इथून हलले नाहीत.
नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, ते सर्व राज्यातील विरोधी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असून 2024 च्या निवडणुकीत जनता या सरकारला केंद्रातील सत्तेतून बाहेर फेकून देईल. काही लोकांना आमच्या भरती प्रक्रियेत त्रुटी दिसतात, मात्र रेल्वे, केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये होत असलेल्या भरतीबाबत काहीच का सांगितले जात नाही. आज रुपयाची किंमत निचांकी पातळीवर आहे.
केंद्र सरकारने आता मुरमुऱ्यावरही जीएसटी लावला आहे, त्यामुळे आता भाजपचे लोक ते खाणार नाहीत. मिठाई, लस्सी आणि दही यावर जीएसटी लावला. लोक आता काय खातील? रुग्णालयातही जीएसटी आकारला जात आहे, अशा विविध मुद्यांवरून ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.
दरम्यान, बंगालमधील सत्ताधारी टीएमसी दरवर्षी 21 जुलै रोजी शहीद दिन रॅलीचे आयोजन करते. आजच्या रॅलीत पक्षाचे हजारो समर्थक उपस्थित होते. रॅलीमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती आणि महागाईवरून केंद्रावर जोरदार निशाणा साधण्यात आला.
यावेळी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, पक्ष पश्चिम बंगालच्या बाहेर विस्तार योजना सुरू ठेवेल आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्याबाहेर जागा जिंकेल. मला वर्षभरापूर्वी पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले असून पश्चिम बंगालबाहेर पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. जोपर्यंत आमच्या पक्षाची चिन्हे देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात फुलत नाहीत तोपर्यंत मी थांबणार नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत राज्याबाहेरही आम्ही जागा जिंकू असा विश्वास अभिषेक बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केला.