Beauty Tips: वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे आणि चमक कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. विशेषतः ४० वर्षांनंतर त्वचेतील कोलेजन कमी होत असल्याने चेहऱ्याची चमक कमी होत जाते. मात्र योग्य स्किन केअर रूटीनचा अवलंब केल्यास त्वचा अधिक काळ निरोगी आणि चमकदार ठेवता येते. सध्या अनेक सेलिब्रिटी वापरत असलेला आइस वॉटर फेशियल हा त्यातील एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला जात आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच उष्णता, घाम आणि धूळ यांचा त्वचेवर परिणाम दिसू लागतो. त्यामुळे त्वचा काळवंडणे, तेलकटपणा वाढणे आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत आइस वॉटर फेशियल त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्याच्या दिनक्रमात हा उपाय नियमित करतात. आलिया भट्ट आणि कॅटरीना कैफ यांसारख्या अभिनेत्री सकाळी उठल्यानंतर किंवा मेकअप करण्यापूर्वी काही सेकंद चेहरा बर्फाच्या पाण्यात ठेवतात. यामुळे त्वचेला त्वरित ताजेपणा मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसतो. Beauty tip आइस वॉटर फेशियलचे फायदे १. त्वचा घट्ट होते थंड पाण्यामुळे त्वचेचे पोर्स आकुंचन पावतात. त्यामुळे त्वचा अधिक टाइट दिसते आणि सुरकुत्या काही प्रमाणात कमी दिसू शकतात. २. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते बर्फाच्या पाण्यामुळे चेहऱ्यातील रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे त्वचेला गुलाबी आणि ताजेतवाने लूक मिळतो. ३. सूज आणि पफिनेस कमी होते सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या डोळ्याखाली किंवा चेहऱ्यावर सूज दिसते. आइस वॉटर फेशियल केल्याने ही सूज पटकन कमी होते. ४. मेकअप जास्त वेळ टिकतो मेकअप करण्यापूर्वी हा उपाय केल्यास त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित होते. त्यामुळे मेकअप स्मूथ दिसतो आणि जास्त वेळ टिकतो. आइस वॉटर फेशियल करण्याची योग्य पद्धत हा उपाय खूप सोपा आहे. एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यात काही बर्फाचे तुकडे टाका. त्यानंतर चेहरा त्या पाण्यात १० ते १५ सेकंद बुडवा. ही प्रक्रिया २ ते ३ वेळा करा. यामुळे त्वचेला ताजेपणा मिळतो आणि चेहरा अधिक फ्रेश दिसतो. काही गोष्टी लक्षात ठेवा जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल किंवा सायनसची समस्या असेल, तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच चेहरा जास्त वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवू नये, कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. योग्य स्किन केअर, पुरेसे पाणी, संतुलित आहार आणि नियमित झोप यामुळेही त्वचा निरोगी राहते. त्यामुळे साध्या घरगुती उपायांसोबत चांगल्या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.