काळजी घ्या! राज्यात पुन्हा मास्क सक्ती?; टास्क फोर्सने राज्य सरकारला केल्या ‘या’ महत्त्वाच्या शिफारसी

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने राज्य सरकार, प्रशासन सतर्क झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्ववभूमीवर टास्क फोर्सकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारला महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत.
टास्क फोर्सने सार्वजनिक ठिकाणांसह गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची शिफारस केली आहे. मात्र, ही शिफारस मास्क सक्ती नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी रात्री सरकारच्या टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत करोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा झाली. रुग्णालये, चित्रपटगृहे, बंदिस्त सभागृहे, मॉल्स या ठिकाणीही मास्कचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या करोना रूग्णांमध्ये ताप हे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी 99 अंश किंवा त्याहून अधिक ताप असलेल्या रुग्णांची योग्य दखल घेतली पाहिजे असेही टास्क फोर्सने आपल्या शिफारसीत म्हटले आहे. RAT/RTCR चाचणी केली पाहिजे. संबंधित व्यक्तीची ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर जवळच्या संपर्कातील लोकांची चाचणी केली पाहिजे, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे.
करोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइन गरजेचे असल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. त्याशिवाय, 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, कोमॉर्बिड आणि लसीकरण न केलेल्यांची अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. दरम्यान, खोकला, श्वास लागणे, ताप कायम राहणे आणि आवाज बदलणे आणि घसा खवखवणे यासारखी अतिरिक्त लक्षणे रुग्णालयात दाखल करणे योग्य राहील असेही टास्क फोर्सने सरकारला केलेल्या शिफारसीत म्हटले आहे.





