नगर -करोना पॉझिटिव्ह होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रतिकार शक्ती महत्वाची आहे. ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक औषधे अत्यंत उपयुक्त आहेत. तथापि सध्याच्या काळात कोणीही ही औषधे वाटत आहेत. त्यामुळे त्या औषधांचा दर्जा, उपयुक्तता यावर प्रश्नचिन्ह असून, ती आरोग्याला अपायकारकही ठरू शकतात, असा दावा होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संजय सोनवणे यांनी केला आहे.
करोना विषाणूचा आजार रोखण्यासाठी होमिओपॅथीची प्रतिबंधात्मक आर्सेनिक अल्बम औषधे अत्यंत गुणकारी आहेत. मात्र, ती कोणीही वाटप करीत असल्याचे त्यावर शंका आहेत. त्यामुळे खरचं ही फुकट वाटलेली औषधे घेणे फायदेशीर आहेत का, असा प्रश्न पडतो. वास्तविक ही औषधे होमिओपॅथी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत. मात्र, मतदारसंघात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दादा, ताई, भाऊ ही औषधे वाटत आहेत. त्यातून आरोग्याचे नवीन पेच तयार होण्याचा धोका संभवतो, असा दावा डॉ. सोनवणे यांनी केला आहे.
होमिओपॅथिक औषधे तयार करण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. ती फक्त होमिओपॅथिक डॉक्टरला माहीत असते. सध्याच्या काळात कोणीही हे औषध वाटत आहे. त्या गोळ्यांच्या डब्यावर कोणाही होमिओपॅथी डॉक्टरचे नाव नसते. मग ही औषधे बनवतात कोण, असा प्रश्न पडतो. डॉ. सोनवणे म्हणाले, “”दोन दिवसांपूर्वी एका कार्यकर्त्याने माहिती दिली की, त्यांचे दादा पोत्याने त्या गोळ्या आणतात आणि 10-12 जण बसून त्या गोळ्या डब्ब्यांमध्ये भरतो. हे ऐकूणच अंगावर काटा आला.
त्या अडाणी कार्यकर्त्यांना काय कळणार? औषधे कशी बनवली पाहिजेत. वास्तविक होमिओपॅथीच या गोळ्यांना कुठेही हाताचा किंवा अन्य कशाचाही स्पर्श व्हायला नको. चुकून त्यातली एक जण जरी पॉझिटिव्ह झाली तर? हे किती धोकादायक आहे, याचा विचार होत नाही असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे औषधे वाटण्याचे काम राजकारणी लोकांनी करुच नये. ते काम डॉक्टरांकडेच ठेवावे. अन्यथा त्यातून आरोग्याच्या नव्या समस्या समोर येतील. त्यामुळे औषधे वाटण्याऐवजी सरकारी रुग्णालयात किंवा मोफत औषध वाटपाची जबाबदारी घेण्यास तयार असलेल्यांकडे निधी द्यावा असे डॉ.सोनवणे यांनी सांगितले.