Chandrashekhar Bawankule: नार्को टेस्ट करण्याच्या जरांगेच्या मागणीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले “कोणताही मंत्री किंवा राजकीय नेता…”
Chandrashekhar Bawankule: नार्को टेस्ट करायला माझी कोणतीही हरकत नाही - बावनकुळे

Chandrashekhar Bawankule: मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरवून रद्द करण्यात आल्याने आक्रमक झाले आहेत. अंतरवाली येथे कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.
तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सांगण्यावरूनच ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. एका बावनकुळेंना एवढी ताकद देणार असाल, तर आम्ही तुमचे १५ ते २० आमदार पाडू,” असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जात प्रमाणपत्रांच्या वैधतेवर आणि पडताळणी समितीवर राजकीय दबाव असल्याच्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “जात पडताळणी समितीला अर्ध न्यायालयीन (न्यायिक) दर्जा आहे. कोणत्याही राज्यातील कोणताही मंत्री किंवा राजकीय नेता या समितीला फोन करून आदेश देऊ शकत नाही किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही.
असा प्रकार कुठेही घडत नसल्याचे सांगितले. जात पडताळणी समिती ही त्यांच्यासमोर आलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेत आहेत. जात पडताळणी समिती सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करूनच आपला निर्णय देत असते. जर कोणाला या निर्णयावर आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन या निर्णयाला आव्हान द्यावे.
उच्च न्यायालयात या निर्णयाला स्थगिती मिळू शकते.” तसेच नार्को टेस्ट करायला माझी कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका देखील बावनकुळे यांनी जरांगे यांच्या मागणीवर स्पष्ट केली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे यांनी व्यक्तिगत पातळीवर केलेल्या राजकीय आरोपांवर बोलणे टाळले.
‘२०२९ च्या निवडणुकीत सगळ्याचा हिशोब करू’
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, “माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला असून सरकारकडून मराठ्यांचे वाटोळं सुरू आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण या संपूर्ण कटाचा मी लवकरच पर्दाफाश करणार असून सगळी माहिती बाहेर आणणार आहे. भाजपमधील मराठा नेत्यांनीही हे लक्षात ठेवावे, हे तुमच्याच मुलांच्या भविष्याच्या विरोधात आहे. आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही, २०२९ च्या निवडणुकीत या सगळ्याचा हिशोब केला जाईल.”
३,००० लोकांचे प्रमाणपत्र रद्द करणार का?
दहिहंडे प्रकरणाचा दाखला देत जरांगे यांनी सांगितले, “यशवंता दहिहंडे यांची उर्दूतील नोंद दोन वर्षांपूर्वी सापडली होती. शिंदे समितीने ती नोंद ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावली. यावर त्यांच्या नातवाने कुणबी प्रमाणपत्र मिळवले आणि त्यांच्या पणतूने पॉलिटेक्निकला कुणबी कोट्यातून प्रवेश घेतला. आता त्याच्या ॲडमिशनचे काय करणार? दहिहंडे आडनावाचे ३,००० लोक आहेत, आता या सर्वांचे प्रमाणपत्र रद्द करणार का?”, असा सवाल जरांगे यांनी केला.
हेही वाचा:
Amruta Dhongade : अमृता धोंगडेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; खलनायिकेची साकारणार भूमिका






