Bangladesh Illegal Immigration । बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसेन यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप करताना,”भारत लोकांना परदेशी म्हणत कोणत्याही प्रक्रियेशिवाय त्यांच्या देशात परत पाठवत आहे. बांगलादेश यासंदर्भात भारताला राजनैतिक पत्र पाठवेल” असे म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने बेकायदेशीर बांगलादेशींची चौकशी सुरू केली. ७ मे पासून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्यांच्या हद्दपारीला वेग दिला. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या प्रत्येक बांगलादेशीची चौकशी केली जात आहे, परंतु बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसेन म्हणतात की भारत कोणत्याही प्रक्रियेशिवाय लोकांना सीमेपलीकडे पाठवत आहे. ते म्हणाले, “आम्ही एक नवीन पत्र पाठवू. आम्हाला माहित आहे की हे घडत आहे, परंतु आम्ही ते थांबवू शकत नाही.”असे त्यांनी म्हटले. तौहीद हुसेन यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांबद्दल काय म्हटले? Bangladesh Illegal Immigration । एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, भारताने बांगलादेशला काही बेकायदेशीर स्थलांतरितांची यादी दिली आहे, जे बांगलादेशी असल्याचे मानले जाते. याबद्दल, तौहीद हुसेन म्हणाले की,”बांगलादेशने चौकशीनंतर काही बेकायदेशीर स्थलांतरितांना स्वीकारले आहे. “ते म्हणाले की कॉन्सुलर समस्यांसाठी एक प्रक्रिया आहे आणि बांगलादेश त्याचे अनुसरण करत आहे. भारतासोबत नियमित चर्चा सुरू आहे. त्यांनी पुढे सांगितले की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबत कोणतेही नवीन उत्तर मिळालेले नाही. दुसरे पत्र अद्याप पाठवलेले नाही, परंतु गरज पडल्यास ते पाठवता येईल. दिल्लीतून १६ बेकायदेशीर बांगलादेशींना अटक Bangladesh Illegal Immigration । २ जून रोजी दिल्ली पोलिसांच्या फॉरेनर्स सेल आणि स्पेशल स्टाफच्या संयुक्त पथकाने शाहदराच्या सीमापुरी भागात १६ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये ४ पुरुष, ५ महिला आणि ७ मुले आहेत. हे सर्वजण बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते. चौकशीदरम्यान असे आढळून आले की अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांपैकी बरेच जण १८-१९ वर्षांपूर्वी भारतात आले होते. त्यांनी सांगितले की आर्थिक अडचणी आणि रोजगाराच्या अभावामुळे ते रात्रीच्या अंधारात सीमा ओलांडून भारतात दाखल झाले. सीमा ओलांडल्यानंतर ते प्रथम पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे पोहोचले, नंतर ट्रेनने दिल्लीला आले. काही काळानंतर ते हरियाणाच्या गावांमध्ये गेले, जिथे त्यांनी वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हे भट्टे दुर्गम भागात असल्याने, ते बराच काळ दुर्लक्षित राहिले.