Banana Farmers – जुन्नर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यावर्षी केळीचे उत्पादन भरघोस झाले असून, बागेत केळीच्या घडांनी झाडे अक्षरशः वाकून गेली आहेत. मात्र, कष्टाने पिकवलेल्या या मालाला बाजारात अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवडीपासून ते काढणीपर्यंत केलेला खर्चही निघणे कठीण झाल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. तरुण शेतकरी संपत गायकवाड यांनी सांगितले की, यंदा केळीच्या बागेसाठी सुमारे ६ लाख रुपये खर्च आला. यामध्ये रोपे, खते, औषधे, मजुरी आणि पाणी यांचा समावेश होता. मात्र, विक्रीवेळी बाजारात दर इतके घसरले की त्यांच्या हातात केवळ २ लाख रुपये आले. म्हणजेच एकाच हंगामात त्यांना ४ लाख रुपयांचा थेट तोटा सहन करावा लागला आहे. सध्या बाजारात केळीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. आळेफाटा : घडाच्या वजनाने बागेत कोलमडलेली केळीची झाडे. व्यापाऱ्यांकडून मागणी कमी असल्याचे सांगत अत्यंत कमी दराने मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्याय उरलेला नसल्याने मिळेल त्या दराने विक्री करावी लागत आहे. त्यातच वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हमीभावाची आणि मदतीची मागणी दिवस-रात्र कष्ट करून पिकवलेले उत्पादन कवडीमोलाने विकावे लागत असेल, तर शेती करायची कशी, असा संतप्त सवाल प्रगतशील शेतकरी दत्तात्रय गायकवाड यांनी केला आहे. सरकारने या विषयात तातडीने हस्तक्षेप करून केळीला हमीभाव द्यावा किंवा थेट खरेदी करून निर्यात धोरणातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कृषी विभागाच्या भूमिकेकडे लक्ष शेतकऱ्यांच्या या आर्थिक संकटाकडे कृषी विभागाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. सध्याच्या कठीण काळात विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदत करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. जर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर केळी उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.